सन्मित्र मंडळ पनवेल, पनवेल विभागातील सर्वात जुने तसेच मानाचे पहिले मंडळ. स्वातंत्र्योत्तर काळात प्रांतीयता, भाषा , जातीयता अशा विकृत कल्पनांमुळे विखुरलेल्या समाजाला एकत्र आणून परस्पर स्नेहभाव वृद्धिंगत होण्या हेतूने तसेच समाजाला एकजिनसी बनवावे ह्या प्रधान हेतूने पनवेलमधील उत्साही तरुणांच्या व सुज्ञ नागरिकांच्या प्रयत्नाने 1 जून 1964 रोजी शुभमुहूर्तावर सन्मित्र मंडळ, पनवेल ची स्थापना करण्यात आली.
हिंदू समाज सुकर व एकत्र होणे अग्रक्रमी मानून संस्थेने पहिला गणेशोत्सव कै. अप्पासाहेब सहस्रबुद्धे ह्यांच्या अध्यक्षते 1964 खाली साजरा केला. संस्थेचे तत्कालीन सदस्य, कै गुल्लूशेठ वावा, कै डॉ. नाईक , कै. कुरघोडे, कै. पं. ग. भि. जोशी , कै. वासुअण्णा शेणॉय वगैरे सदस्यांनी उत्सवासाठी अपार मेहनत घेतली.
श्री गणेशोत्सवाच्या बरोबरीनेच समाजोपयोगी कामे करण्या हेतूने डॉ. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या वतीने गरीब व गरजू रुग्णांसाठी रुग्णवोपयोगी साहित्य ठेवण्यात आले. आज गेली 52 वर्षे या साहित्यात वेळेनुसार व गरजेनुसार भर घालून गरजूंना ते उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरु आहे.
अनेक सामाजिक कार्य करणारे मंडळ यास्तव मंडळाच्या श्री गणेशोत्सवाला 'मानाचा पहिला गणपती' असा मान नागरिकांनी दिला आहे.
मनोरंजना बरोबर समाजप्रबोधन या सूत्राने अनेकविध कलाकारांचे कार्यक्रम, स्थानिक कलाकारांना उत्तेजन देणे , याच बरोबर विद्यार्थी वर्गासाठी विविध स्पर्धा , परीक्षा मार्गदर्शन शिबीर आदी शैक्षणिक कार्यातही मंडळ अग्रेसर आहे. पनवेल मध्ये सर्वप्रथम गणेशोत्सव स्मरणिका मंडळाने काढल्याचा मान मंडळाला आहे. तसेच रुग्णउपयोगी साहित्य सुद्धा फक्त आपल्या मंडळाकडेच आहे.
ना नफा ना तोटा ह्या तत्वावर वह्यावाटप उपक्रम सुद्धा मंडळाने राबवले आहेत. त्याचप्रमाणे गणेशोत्सव स्मरणिका प्रकाशित करताना ती समाजोपयोगी व्हावी या उद्देशाने त्यात पनवेल व परिसरातील उपयुक्त माहिती देखील प्रसिद्ध केली जाते याचा फायदा समाजातील विविध घटकांना होत आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये समाजाच्या उपयोगी पडण्यास मंडळ नेहमीच तयार असते.
महाराष्ट्र हादरवणाऱ्या किल्लारी-लातूर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक मदती बरोबरच आमचे कार्यकर्ते श्रमदान देखील करत होते. 2005 सालच्या पनवेल महापुराच्या वेळी प्रत्यक्ष जागेवर आमचे कार्यकर्ते कार्यरत होते.
पूराच्या दिवसापासून ते पुढील 4 दिवस संकटग्रस्तांना मदतीचे सत्र अखंड चालू होते. तसेच 4 दिवस मिळालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे, पूरग्रस्त नागरिकांना अन्नवाटप, तसेच पनवेल परिसरातील वीज व्यवस्था सुरळीत होणेकामी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोलाची कामगार केली.
सन्मित्र मंडळ हे समाजातील सर्व थरातील कार्यकर्ते एकत्र येऊन अतिशय प्रेमभावाने चालवतात. इथे कुठेही राजकीय अथवा राजकीय पक्षाशी निगडित कोणतेही व्यवहार अथवा संलग्नता दिसत नाही, जी आजकाल सर्रास सगळीकडे पाहायला मिळते. राजकीय पटलावर उदय अथवा फायदा होण्यासाठी अचानक गणेशोत्सव मंडळांच्या प्रेमात पडणारे अनेक राजकारणी आपण बघितले असतील. पनवेल हि त्याला अपवाद नाही. परंतु सन्मित्र मंडळ ह्या सर्व अपायी गोष्टी टाळत नेटाने आपली शुभ्र प्रतिमा आणि प्रतिमेला शोभेल असं काम अजूनही नेटाने करते आहे, आणि गजाननाच्या आशिर्वादाने पुढेही करत राहील.
पनवेलच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सन्मित्र मंडळाचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. मंडळातर्फे नानाविध उपक्रम राबविताना मंडळाचे कार्यकर्ते आणि स्नेही अपार मेहनत घेतात. श्री गजानन चरणी हीच प्रार्थना अशा कार्यकर्त्यांची मंडळास कधीही उणीव भासणार नाही.
सन्मित्र मंडळ आपल्या पारंपरिक उत्सवासाठी तसेच लोकमान्यांना अपेक्षित गणेशोत्सवाचे स्वरूप निरंतर टिकवून आहे. मंडळाने कधीच कोणत्याही धटिंगपणाचा किंवा सध्या चलतीत असणाऱ्या विकृत स्वरूपाचा आपल्या उत्सव साजऱ्या करण्याच्या पद्धतीत समावेश केला नाही व कधी करणार हि नाही. गणेशोत्सवात आजपर्यंत फक्त आणि फक्त पारंपरिक सात्विक पद्धतीचं अवलंबन झालेलं आपल्याला दिसेल. म्हणूनच बाकी सर्व गणेशोत्सव मंडळांपेक्षा सन्मित्र मंडळाचं आयोजन उठावदार दिसत. गणेशोत्सवात अनेक सांस्कृतिक तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे प्रबोधन करणारे अनेक कार्यक्रम मंडळ वर्षानुवर्षे करत आहे. गणेशोत्सव सोहळा तसेच श्रींचा विसर्जन सोहळा निर्विघ्न व सुकर पार पडावा ह्यासाठी हि मंडळ दरवर्षी अनेक उपाययोजनांसह अथक परिश्रम घेते. लोकमान्यांनी सामाजिक ऐक्याच प्रतीक म्हणून चालू केलेला सोहळा आपलं जुन सात्विक आणि शक्तिशाली स्वरूप टिकवून समाजात बांधिलकी आणि बंधुभाव वाढेल ह्यासाठी मंडळ नेहमीच कटिबद्ध राहील.
डीजे किंवा बाकी अश्लाघ्य पद्धतींनी विसर्जन सोहळा साजरा करण्याच्या पद्धतींनी फाटा देत मंडळ वर्षानुवर्षे आपली पारंपरिक विसर्जन सोहळा मिरवणूक नेटाने आणि अभिमानाने जपत आहे. पारंपरिक वेशात येणारे मंडळाचे कार्यकर्ते आणि मंडळाचे स्नेही अतिशय भक्तिभावाने श्रींची मिरवणूक, ताल-घोषाच्या नादात, आनंदाने भजन कीर्तने गाऊन साजरे करतात. कमरेला धोतर आणि वरती सादर आणि टोपी अश्या परिपूर्ण वेशात भाविक अतिशय श्रद्धेने ह्या मिरवणुकीत सामील होतात. भगवा झेंडा पूर्ण पनवेल भर फडकावत पारंपरिक अभंग-कीर्तनाच्या जयघोषाने गजाननाला मानवंदना देतात. अखेरीस देवळात जिथे श्रींची मूर्ती विसर्जित करण्यात येते तेथे होणार आरती सोहळा हि अतिशय वेगळ्या स्वरूपाचा तसेच भक्तिभावाने भरलेला असतो.